चोपडा (प्रतिनिधी) : - -
आपली जीभच आपली नाती आणि शरीर खराब करते ~ डॉ. मिलिंद सरदार
आदर्श जीवनासाठी अर्धपोटी राहणे, सात्विक आहार, जेवणाच्या वेळा, सकारात्मक विचार, बोलण्यावर नियंत्रण, प्राणायाम, ध्यान आवश्यक आहे. असंतुलीत आहार, व्यायामाचा अभाव, मानसिक ताणतणाव हीच मानवी अनारोग्याची मुख्य कारणे आहेत. चव आवडली म्हणून अती खाल्ल्याने व दुसऱ्याच्या भावनेचा आदर न करता वाटेल ते बोलल्याने आपले नुकसान होते. आपली जीभच आपली नाती आणि शरीर खराब करते, असे सांगत आपल्यातील बदलांना सुरुवात करणे आवश्यक असल्याचे माधवबाग कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. मिलिंद सरदार (पुणे) यांनी मिश्किल भाषेत सांगितले.
डॉ. मिलिंद सरदार चोपडा येथील महाराष्ट्र साहित्य परिषद आयोजित प्रियजन स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना 'आनंदी आणि सुदृढ जीवनाची गुरुकिल्ली' या विषयावर श्रोत्यांशी संवाद साधत होते. येथील पंकज बाल संस्कार केंद्राच्या आवारात सुरु असलेल्या व्याख्यानमालेच्या प्रसंगी मंचावर प्रायोजक डॉ. विकास हरताळकर, कुसुम पाटील, भूपेंद्र पाटील यांच्यासह पंकज समूहाचे डॉ. सुरेश बोरोले, उपनगराध्यक्ष पंकज बोरोले, शाखेचे अध्यक्ष अशोक सोनवणे, उपाध्यक्ष राजेंद्र महाजन, कार्याध्यक्ष विलास पाटील उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना ते पुढे म्हणाले, सद्यस्थितीत भारतात 56 टक्के हृदयरोगाचे रुग्ण आहेत तर परदेशात फक्त 26 टक्के रुग्ण आहेत. कारण आपल्याकडे अतीत्रास झाल्यानंतर डॉक्टरकडे जाण्याची मानसिकता आहे. प्रतिबंधात्मक उपाय करण्याकडे आणि तशा जीवनशैलीकडे आपण दुर्लक्ष करतो. सगळे आजार आपणच आपल्या घरात निर्माण करतो तसेच ते आपणच दूर करु शकतो. त्यासाठी आपल्या दररोजच्या आहारात पालेभाज्या, फळभाज्या आणि कोशिंबिरी आवश्यक आहेत. रात्री 7 नंतर जेवू नये तसेच भूक लागेल तेव्हा आणि भूक असेल तेवढेच खावे. दररोज 3 किमी चालावे व नियमित व्यायाम करावा. नियमित प्राणायाम व ध्यान करावे. यासोबत जीवन जगत असताना माफी मागणे आणि माफ करणे, हे धोरण असावे. जगावर प्रेम करावे. स्वतःचा अहंकार सोडात इतरांच्या चांगल्या कामाचे कौतुक करावे. दररोज भरपूर हसावे. आनंदी आणि सुदृढ जीवनाची गुरुकिल्ली आपल्या स्वतः जवळ आहे. यावेळी व्याख्यानानादरम्यान 'कधीपासून सुरुवात करणार ?' हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत त्यांनी उपस्थितांना विचार करुन अंतर्मुख व्हायला लावले.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक सोनवणे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. संदीप पाटील यांनी, वक्त्यांचा परिचय प्रभाकर महाजन यांनी व आभार प्रदर्शन धनश्री सनेर यांनी केले. यावेळी प्रायोजकांचा सत्कार करण्यात आला. व्याख्यानास श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
WhatsApp
No comments:
Post a Comment