चोपडा (प्रतिनिधी) : - -
पंकज विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांना मोलाचे मार्गदर्शन....
पंकज विद्यालयात इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पालकसभेला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. शाळेच्या सभागृहात पालकांची लक्षणीय गर्दी झाल्याने संपूर्ण परिसर उत्साहपूर्ण वातावरणाने भारावून गेला.
मेळाव्याचे अध्यक्षस्थान अडावद येथील धनराज बाजीराव पाटील यांनी भूषविले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित पालकांचे स्वागत करून शाळा व पालक यांच्यातील समन्वय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी किती महत्त्वाचा आहे, यावर भर देण्यात आला. यावेळी "राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि पालकांची भूमिका" या विषयावर आर. डी. पाटील यांनी मार्गदर्शन करत नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पालकांचा सक्रिय सहभाग, विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास, मूल्यशिक्षण, अनुभवाधारित शिक्षण आणि घरातील सकारात्मक वातावरणाचे महत्त्व विशद केले.
त्यानंतर "नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची ओळख" या विषयावर श्रीमती गायत्री शिंदे यांनी इयत्ता पहिलीच्या नवीन अभ्यासक्रमाची रचना, कृतीआधारित शिक्षण, भाषा व गणित विषयातील उपक्रम, गृहपाठाची पद्धत तसेच पालकांनी घरी मुलांना कशा प्रकारे सहकार्य करावे याबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील यांनी विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार, शिस्त, स्वच्छतेच्या सवयी, वेळेचे नियोजन, नियमित उपस्थिती, वाचन संस्कृती, मोबाईलच्या अतिरेकामुळे होणारे दुष्परिणाम, पौष्टिक आहाराचे महत्त्व तसेच विद्यार्थ्यांच्या भावनिक, बौद्धिक आणि सामाजिक विकासासाठी पालकांनी घ्यावयाची काळजी याबाबत अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले. शाळा केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षणच नव्हे, तर संस्कारक्षम, जबाबदार आणि आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी सातत्याने विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व व्यक्तिमत्त्व विकासाचे उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून करिष्मा बावनकुळे, मिना प्रवीण पाटील, प्रकाश भिला पाटील व नानाजी उत्तम पाटील उपस्थित होते. पालक प्रतिनिधी करिष्मा बावनकुळे व अध्यक्ष धनराज बाजीराव पाटील यांनी मनोगत व्यक्त करत विद्यालयाच्या उपक्रमशील कार्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शाळा आणि पालक यांनी परस्पर विश्वास, संवाद आणि सहकार्याच्या भावनेने एकत्रितपणे कार्य करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मेळाव्या दरम्यान पालकांनी शिक्षकांशी संवाद साधून विविध शंकांचे निरसन करून घेतले. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी शाळेने राबविलेल्या उपक्रमांचे पालकांनी मनापासून स्वागत केले.
कार्यक्रमाच्या शेवटी पालकांनी आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांसमवेत आनंददायी समूह छायाचित्र काढून या संस्मरणीय क्षणाची नोंद केली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन माधुरी पाटील यांनी केले. पालकांचा उत्स्फूर्त सहभाग, शिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन आणि शाळा-पालक यांच्यातील दृढ समन्वयामुळे हा पालक मेळावा अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
WhatsApp
No comments:
Post a Comment