११ मे “महात्मा दिन” देशभरात साजरा करावा श्री संत सावता माळी युवक संघा तर्फे तहसीलदार यांना निवेदन
महात्मा जोतिराव फुले यांना महाराष्ट्रातील दुसरे समाज सुधारक रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे व रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेने ११ मे १८८८ रोजी “महात्मा” ही पदवी प्रदान केली. त्या वेळे पासून देश त्यांना महात्मा म्हणून ओळखू लागला आहे.आता हा दिवस सरकारने “महात्मा दिन” या नावाने साजरा करण्याची मागणी श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य यांनी संघटनेच्या माध्यमातून सरकारकडे केली आहे.
महात्मा फुले यांचे कार्य जगाला सर्वश्रुतच आहे. स्त्री - शुद्र - अतीशुद्र समाजाच्या उन्नतीसाठी सावित्रीबाई फुले व जोतीबा फुले ज्या तन्मयतेने झटत होते, त्यासाठी त्यांनी जे कष्ट उपसले होते, त्यामोबदल्यात महाराष्ट्रातील विशेषतः पुण्यातील ब्राम्हण शाहीने त्यांचा अतोनात छळ व अपमान केला होता. त्यामुळे सत्यशोधक कार्यकर्त्यांमध्ये व बहुजनांमध्ये त्यांचा आदर दुणावला होता. मांडवीच्या रघुनाथ सभागृहात आपल्या उद्धारकर्त्या महामानवाचे ऋण फेडण्यासाठी गरीब व कष्टकरी जनतेने मोठ्या संख्येने आणि उत्स्फुर्तपणे जमून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विडा उचलला होता. मुंबईकर सत्यशोधक कार्यकर्ते व नारायण मेघाजी लोखंडे यांच्या आमंत्रणां वरुन जोतीबा फुले मुंबईला आले होते, तेव्हा मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेच्या वतीने ११ मे १८८८ रोजी जोतीबा फुलेंना युगप्रवर्तक कार्याबद्दल "महात्मा" पदवीने गौरविण्यात आले. त्यादिवसा पासुन आपण सर्वांना जोतीबा फुले "महात्मा फुले" नावाने परिचित झाले.
११ मे २०२३ रोजी त्या घटनेस १३५ वर्षे पुर्ण होत आहेत. या घटनेचा वेध घेऊन श्री संत सावता माळी युवक संघ,महाराष्ट्र राज्य या संघटनेने देशभर सलग ८ वर्ष विविध उपक्रम घेऊन हा विशेष दिन साजरा केला तसेच या दिवसास “महात्मा दिन” असे नाव दिले.
महात्मा फुले नावाने प्रसिद्ध व परिचित असलेले जोतीराव ऊर्फ जोतीबा गोविंदराव फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती. ही पदवी त्यांना ११ मे इ.स.१८८८ या साली मिळाली, त्यामुळेच ११ मे या दिवसाला महत्व प्राप्त झाले असुन ११ मे रोजी “महात्मा दिन” म्हणुन साजरा करण्यात यावा, असे निवेदनात श्री संत सावता माळी युवक संघाचे प्रदेश अध्यक्ष जितेंद्र सुरेश महाजन, रा. यु. कॉ.चे शहराध्यक्ष समाधान माळी, यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन केली त्यावेळी अल्केश माळी रोहित भाऊ महेंद्र राजकुळे नरेंद्र भाऊ आधी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment