भारताची लोकशाही आपल्या वर्गखोलीत निर्माण होणार आहे शिक्षण चिंतन परिषदेत विवेक सावंत यांचे प्रतिपादन - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

13/01/2024

भारताची लोकशाही आपल्या वर्गखोलीत निर्माण होणार आहे शिक्षण चिंतन परिषदेत विवेक सावंत यांचे प्रतिपादन


 चोपडा (प्रतिनिधी) : - -

          भारताची लोकशाही आपल्या वर्गखोलीत निर्माण होणार आहे शिक्षण चिंतन परिषदेत विवेक सावंत यांचे प्रतिपादन 

        ज्ञान दोन प्रकारचे असते इहलौकिक आणि वैज्ञानिक. आदिमानवा पासून ज्ञानाच्या क्रांतीची सुरुवात झाली. शून्याचा शोध लागला त्यामुळे ज्ञानक्रांती झालेली आहे. भारताची लोकशाही ही आपल्या वर्गखोलीत निर्माण होणार आहे. मानवी बुद्धिमत्ता व कृत्रिम बुद्धिमता या दोन्ही कौशल्यांचा संयोग आपल्याला साधावा लागेल व त्याचा अधिकाधिक वापर करुन प्रगती, नवे शोध लावण्यासाठी प्रत्येकाने आपल्या क्षमता वाढवून समर्पित भावाने प्रयत्न केले तर मानवी जीवन समृद्ध होण्यास नक्कीच हातभार लागेल. असे मत श्री.विवेक सावंत (प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र ज्ञान महामंडळ पुणे MKCL) यांनी विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र संचलित, विवेकानंद विद्यालय, चोपडा तर्फे स्वामी विवेकानंद जयंती व संस्थेचा वर्धापन दिन यानिमित्त आयोजित शिक्षण चिंतन परिषदेत व्यक्त केले.

        कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांच्या भव्य मूर्तिस माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून तसेच स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन श्री विवेक सावंत, विधानसभेचे माजी सभापती श्री.अरुणभाई गुजराथी यांचे हस्ते करण्यात आले. विद्यालयातील अध्यापकांनी 'देश माझा मी देशाचा...' हे गीत सादर केले. त्यानंतर माध्यमिक शालांत परीक्षेत (SSC 2023) विद्यालयातून प्रथम तीन  क्रमांक प्राप्त झालेल्या चि.निखिल ज्ञानेश्वर पाटील (प्रथम), कु.मनस्वी किरण चौधरी (द्वितीय), कु.लीना नितीन सोनवणे (तृतीय) या विद्यार्थ्यांचा त्यांच्या आई-बाबांसह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर श्री.अरुणभाई गुजराथी यांनी संस्थेच्या वाटचालीसाठी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या.

         सावंत यांनी आपले विचार व्यक्त करतांना भारताला ज्ञानयुगात झेप घ्यायची असेल तर कर्मशील ज्ञानाचा सतत परिपोष करावा लागेल ते आम्हाला निर्माण करावे लागेल आणि मग त्यावेळी ज्ञानाधिष्ठित समाज निर्माण होईल. त्या त्या काळात त्या त्या मानवी समूहांनी जे विलक्षण ज्ञान निर्माण केलं आणि त्या ज्ञानाचे संबंधितांमध्ये वितरण केले आणि वितरण करुन ते थांबले नाहीत तर त्याचे उपयोजन केले म्हणून प्रत्येक क्रांती होत गेली. ज्ञानक्रांती,कृषीक्रांती आणि औद्योगिक क्रांती अशाप्रकारे होत गेल्याचे ते म्हणाले. अध्यात्मामध्ये दोन भ्रांती आहेत त्या म्हणजे भेद भ्रांती आणि अभेद भ्रांती या दोन्ही भ्रांतीतून मुक्ती म्हणजे ज्ञान. हे नमूद करतांना त्यांनी वेगवेगळे संदर्भ दिले व मनोरंजक गोष्टीही सांगितल्या. निसर्ग विज्ञान समजून घ्यावे लागेल. इतर देशात शिक्षणासाठी देण्यात येणारे महत्त्व त्यासाठी केला जाणारा खर्च तसेच आपल्या भारतात बालशिक्षणाकडे व्यवस्थित लक्ष घातल्यास देशातील समस्या कशा सुटतील व त्याचे किती चांगले दूरगामी परिणाम होतील, लोकशाही किती सुदृढ होईल याबद्दल त्यांनी आपले विचार मांडले.

         शिक्षकाच्या एका Smile ने विद्यार्थ्यांच्या भावनिक मेंदूला सुरक्षितता प्राप्त होते. विद्यार्थ्यांना आपल्याला माहितीकडून माहितीकडे घेऊन न जाता एकविसाव्या शतकात माहितीकडून ज्ञानाकडे न्यायचे आहे. त्यांना वेगळा विचार करता यायला हवा. तो त्यांना करु द्यावा. प्रत्येक विद्यार्थी हा त्याच्या इतर सहध्यायी विद्यार्थ्यांच्या मतांबद्दल सहिष्णू असतो. Learning by failure हे लहानपणापासून होत असल्याचे ते म्हणाले. समारोप प्रसंगी भारत या शब्दाचा अर्थ सांगताना ते म्हणाले की 'भाकरीच्या विवंचनेत रत अशी पूर्वी भारत या शब्दाची व्युत्पत्ती होती. परंतु ज्ञानक्रांती झाली आणि विवंचना संपली. उपासमार कमी झाली. विज्ञानाने क्रांती केली. परंतु संस्कृतमध्ये 'ज्ञानाच्या उपासनेत रममाण झालेला' ही भारत या शब्दाची व्युत्पत्ती आहे. असा भारत निर्माण करणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. असा भारत निर्माण झाला की तो ज्ञान युगात झेप घेईल. अशा प्रेरक विचारांनी विवेक सावंत यांनी उपस्थितांना एक तास वीस मिनिटे मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.पवन लाठी यांनी प्रास्ताविक श्री.नरेंद्र भावे यांनी तर परिचय प्रसाद वैद्य यांनी करुन दिला. राकेश विसपुते यांनी पसायदान सादर केले.

         याप्रसंगी विधानसभेचे मा.सभापती अरुणभाई गुजराथी, संस्थेचे अध्यक्ष डाॅ.विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डाॅ.विकास हरताळकर, उपाध्यक्ष श्री. घनश्यामभाई अग्रवाल, सचिव ॲड.रवींद्र जैन, सहसचिव डाॅ. विनीत हरताळकर, विश्वस्त डॉ.जयंत पाटील, श्री.दिव्येश पटेल, विश्वस्त डाॅ.अमित हरताळकर, डाॅ.नीरज पोतदार, डॉ.सौ.नीता हरताळकर व सौ.जोस्ना हरताळकर, श्रीमती आशा चित्ते, सौ.सुरेखा मिस्तरी, सौ.माधवी भावे व संस्थेचे सर्व पदाधिकारी, चोपडा एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या सचिव श्रीमती माधुरीताई मयूर, मा. शिक्षक आमदार दिलीपराव सोनवणे, गटशिक्षणाधिकारी श्री.अविनाश पाटील, श्री. संतोष बिरारी मंचावर उपस्थित होते. त्याचबरोबर परिसरातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर, पत्रकार बांधव  व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज