चोपडा (प्रतिनिधी) : - -
आनंदी व सुखी जीवनासाठी, सकारात्मक विचारसरणी ठेवली तर अनेक आजारांपासून दूर राहता येते - डॉ. मिलिंद सरदार यांचे प्रतिपादन
पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले यांच्या वाढदिवसा निमित्त पंकज बालसंस्कार केंद्र, चोपडा येथे डॉ. मिलिंद सरदार (समन्वयक, माधवबाग आरोग्य संस्था, पुणे) यांचे प्रेरणादायी व मार्गदर्शक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास शहरातील विचारवंत, नामवंत व्यक्ती, बुद्धिजीवी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुमारे दोन तास चाललेल्या या व्याख्यानात डॉ. सरदार यांनी श्रोत्यांना अक्षरशः खिळवून ठेवत आरोग्यदायी आणि आनंदी जीवन जगण्याचे सोपे पण प्रभावी मंत्र दिले. “मीच माझ्या आनंदी व सुखी जीवनाचा शिल्पकार आहे” या संकल्पनेवर त्यांनी विशेष भर देत, सकारात्मक विचारसरणी ठेवली तर अनेक आजारांपासून दूर राहता येते, असे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी मधुमेह (Diabetes) या वाढत्या आजाराबाबत सखोल मार्गदर्शन केले. चुकीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव, अतिस्थूलता, उच्च रक्तदाब आणि ताणतणाव ही मधुमेहाची प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि सकारात्मक विचारांच्या मदतीने मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते, असेही त्यांनी सांगितले. आहारविषयक मार्गदर्शन करताना त्यांनी सात्त्विक अन्न, साखरेचे कमी सेवन, मैदा व पॅकबंद खाद्यपदार्थ टाळण्याचा सल्ला दिला. तसेच योग, प्राणायाम आणि आयुर्वेद यांचा दैनंदिन जीवनात समावेश केल्यास शरीर आणि मन निरोगी राहते, असे त्यांनी नमूद केले.
“आपण स्वतःच आपले डॉक्टर आहोत. स्वतःची योग्य काळजी घेतली, तर डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येणार नाही,” असा मोलाचा संदेश देत त्यांनी ‘इगो’ (अहंकार) दूर ठेवण्याचाही सल्ला दिला. सदर व्याख्यानातून उपस्थितांना आरोग्य, जीवनशैली आणि मानसिक संतुलन याबाबत बहुमोल मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना बद्दल उपस्थितांनी संस्थेचे विशेष कौतुक केले.
WhatsApp
No comments:
Post a Comment