चोपडा (प्रतिनिधी) : - -
मनात विचारांचा कचरा घेऊन फिरल्यास आयुष्य दुःखी होते ; बारी समाजाच्या कार्यक्रमात सौ. दीप्ती बारी यांचे प्रतिपादन
मुलांची स्वप्न पूर्ण करण्यात स्वतःची स्वप्न विसरू नका. स्वतःची अपूर्ण राहिलेली स्वप्ने जपा आणि त्यांचा पाठलाग करा. आपण करत असलेले प्रयत्न बघून मुलांना प्रेरणा मिळते. थोडी जरी असली तरी दररोजच्या जगण्यात प्रगती महत्वाची आहे. जे नको त्याचा जास्त विचार करतो आणि ते नेमके घडते म्हणून काय नको यापेक्षा काय हवे याचाच अधिक विचार करावा. आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेबाबत प्रश्न विचारायला शिकले पाहिजे, असे सांगत मनात विचारांचा कचरा घेऊन फिरल्यास आयुष्य दुःखी होते, असा सल्ला प्रसिद्ध समुपदेशक सौ. दीप्ती बारी (जळगाव) यांनी दिला.
चोपडा येथील बारीवाड्यात श्री समस्त सूर्यवंशीय बारी समाज पंच मंडळ चोपडा, नागवेल मित्र मंडळ व बारी समाज महिला मंडळातर्फे आयोजित गुणगौरव समारंभात बोलत होत्या. यावेळी मंचावर रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय बारी, पंच मंडळाचे अध्यक्ष लोटन बारी, उपाध्यक्ष राजेंद्र बारी, सचिव जगन बारी, गणेश बारी, सौ उषा बारी हे उपस्थित होते.
यावेळी स्वातंत्र्य दिनानिमित्त घेण्यात आलेल्या रंगभरण, सुंदर हस्ताक्षर, सामान्यज्ञान, वक्तृत्व स्पर्धांमधील विजेत्यांचा तसेच विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तर रोटरी क्लब ऑफ चोपडाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या संजय बारी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वसंत नागपुरे यांनी केले. कार्यक्रमास समाज बांधवांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती तर महिलांची संख्या लक्षणीय होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागवेल मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
WhatsApp
No comments:
Post a Comment